मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांचे आवाहन
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून दि. १७ नोव्हेंबर, २०२० ते १५ डिसेंबर २०२० या कालावधीत हरकती व दावे स्वीकारण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांची मतदार म्हणून नोंदणी झाली नाही आणि ज्यांचे वय दि. १ जानेवारी २०२१ रोजी १८ वर्ष पूर्ण होत आहे त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणे आवश्यक आहे त्यांनी फॉर्म ६ भरुन द्यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.
मयत व स्थलांतरीत मतदार असतील त्यांचा शोध घेण्यात येऊन त्यांची नावे मतदार यादीतून कमी करावयाची आहेत. त्यासाठी फॉर्म ७ भरुन द्यावयाचा आहे. तसेच मतदार यादीत नाव, वय, लिंग या बाबी चुकीच्या नोंदविल्या असतील त्यामध्ये दुरुस्ती करावयाची आहे. यासाठी फॉर्म ८ भरुन द्यावयाचा आहे.
या मोहिमेमध्ये मतदार यादी अचूक व निर्दोष होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी www.nvsp.in या पोर्टलचा वापर करता येईल. अधिक माहितीसाठी १९५० या टोल फ्री क्रमांकाचा वापर करता येईल.
मतदार यादीत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे अथवा नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी विहीत नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन, मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात येत आहे.
