सुभाष भामरे-गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. ह्या भेटीमध्ये सुभाष भामरे आणि गिरीश महाजन ह्यांनी अण्णांनी आपले उपोषण मागे घ्यावे यासाठी सुमारे तीन तास अण्णांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या या प्रयत्नांना यश आले नाही.
सरकार जोपर्यंत लोकपाल नियुक्ती करत नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही असे अण्णा हजारे यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या सुभाष भामरे आणि गिरीश महाजन यांना सांगितले. अण्णा आपल्या उपोषणावर ठाम असल्याने या भेटीत कोणताच उपाय निघालेला नाही.
स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी आणि लोकपाल नियुक्ती या मागण्यांवर सरकार आपल्याला समाधानकारक उत्तर न देता दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप अण्णांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी आणि सचिव अजून किती दिवस अभ्यास करणार आहेत असा सवाल अण्णांनी यावेळी केला.
अण्णांच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महत्व पूर्ण तोडगा काढू, लोकपाल नियुक्तीबाबत 28 तारखेला निर्णय होईल व 10 मार्चपर्यंत त्याची अमलबजावणी होईल असे केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.