वाराणसीत नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी प्रियंका गांधी उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?
उत्तर प्रदेश: यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिवसेंदिवस वेगवेगळे चित्र पहावयास मिळत आहे. त्यातच काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी रायबरेली येथे झालेल्या एका बैठकीत मी वाराणसीतून लोकसभेची निवडणूक लढवू का? असा सवाल पक्ष कार्यकर्त्यांना विचारला आहे. या प्रश्नावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली असून आता उत्तर प्रदेशात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
प्रियांका गांधी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. प्रयागराज ते वाराणसी अशी गंगायात्रा देखील त्यांनी केली. या यात्रे दरम्यान त्यांनी अनेक लोकांशी संवाद साधला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतूनच लोकसभा निवडणूक लढवणार आहेत तर सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवतील.
प्रियंका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांना वाराणसी येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यात येईल, अशा अंदाज वर्तवण्यात येऊ लागला आहे.