66 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन रायगड जिल्ह्यातील रोहा येथे करण्यात आलं आहे. कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय रेल्वेने महाराष्ट्र संघाचा पराभव केला. 20-47 ने महाराष्ट्राला रेल्वेकडून पराभव स्वीकारावा लागला. आता पुढचा अंतिम सामना सेनादल आणि भारतीय रेल्वे यांमध्ये होणार आहे.
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत देशातील 31 मातब्बर संघांनी सहभाग घेतला होता. उपांत्य फेरीत हरियाणा, सेनादल, भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्रने स्थान मिळवलं होतं.
उपांत्य फेरीत भारतीय रेल्वे संघाने महाराष्ट्राच्या संघाचा चांगलाच धुव्वा उडवला, तर सेनादलाने हरियाणाला पराभवाची धूळ चारली. 52 गुण सेनादलाने मिळवत हरियाणावर 14 गुणांनी मात केली.
बिहारवर महाराष्ट्राच्या संघाने 39 -16 अशी मात केली तर उत्तर प्रदेशच्या संघावर हरियाणाने एका गुणाने 49-48 अशी मात करीत उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीमध्ये महाराष्ट्राच्या विकास काळे, रिशांक देवाडिगा, अजिंक्य पवार, आणि तुषार पाटील यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली होती.