मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
राज्यात मोठ्या प्रमाणात उकाडा आहे. कडक ऊन्हामुळे जिवाची लाही लाही होताना पहावयास मिळत आहे तर दुसरीकडे जालना, बीड, हिंगोली, लातूर आदी जिल्ह्य़ात गुरुवारी सायंकाळी अचानक वादळ-वारे आणि गारांसह जोरदार पाऊस झाला.
वादळी वार्यासह पाऊस झाल्याने आंबा, द्राक्ष, भाजी पाला, लिंबू आदींचे मोठे नूकसान झाले, तर अनेक ठिकाणी झाडे पडली. अनेक ठिकाणी जोरदार वार्यामुळे जनावरांच्या पत्रा शेड उडून पडल्याने जनावरांचे हाल झाले.
वार्याचा जोर जास्त असल्याने परिसरातील झाडाच्या फांद्या तुटून पडल्या, ठिकठिकाणी झाडे कोलमोडली. बीड जिल्ह्य़ात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. तर, हिंगोली शहराजवळील सावरखेड महामार्गावर एक बाभळीचे मोठे झाड रस्त्यावरच उन्मळून पडल्याने वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.
औरंगाबाद, हिंगोली या शहरात रात्रीपर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.