आठ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी…सचिनचे स्वप्न पूर्ण झाले
आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी गर्वाचा दिवस म्हणून आठवणीत राहणार आहे. आजच्याच दिवशी आठ वर्षांपूर्वी २ एप्रिल २०११ ला भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे पार पडलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा तो थरार आजही कोणी विसरु शकलेलं नाही. शेवटच्या षटकापर्यंत या सामन्याने अनेकांचीच स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं होतं. खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचंही स्वप्न या निमित्ताने साकार झालं होतं. ज्यामध्ये संघाशी संलग्न प्रत्येक व्यक्तीसोबतच महत्त्वाची भूमिका निभावली ती म्हणजे महेंद्रसिंह धोनीने.
१९८३ मध्ये भारताला पहिल्यांदाच क्रिकेटच्या विश्वात नवीन गोष्ट करून दाखवण्याची संधी मिळाली. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघ तिसरा आहे ज्याने दोन किंवा अधिकवेळा विश्व चषकावर स्वतःचे नाव कोरले आहे.
आठ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता आणि २८ वर्षांचा दुष्काळ संपवला होता. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात श्रीलंकेने ५० षटकात २७४ धावा केल्या. भारताचा संघ २७४ धावांचे आवाहन स्वीकारून मैदानात उतरला. आपल्या घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेल्या सचिन तेंडुलकरला अंतिम सामन्यात फलंदाजीत अपयश आले. त्यामुळे चाहत्यांची मोठ्या प्रमाणत निराशा झाली होती. त्यानंतर गौतम गंभीरने एका बाजूने गड राखत ९७ धावांच्या खेळीनं सामन्याचे चित्र बदलले. युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
विश्वचषक जिकंण्यासाठी भारताला ११ चेंडूवर फक्त ४ धावांची गरज होती. त्याचवेळी धोनीने हेलिकॉप्टर शॉट मारत भारताला विजय मिळवून दिला. धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटमुळे भारताने दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव मोठ्या गर्वाने कोरले.
Best moment of my cricketing life.🏏 @cricketworldcup @BCCI pic.twitter.com/WByz1Y4cxX
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 2, 2019