“धरणातील गाळ काढण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करावे” – मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील
पुणे, दि. २६: गाळ साचल्यामुळे धरणातील पाणी साठवण क्षमता कमी होते. त्यामुळे पानशेत व वरसगाव धरणातील गाळाच्या प्रमाणाचे सर्वेक्षण करून गाळ काढण्याच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.
पानशेत व वरसगाव धरणांच्या पाहणी प्रसंगी त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी आमदार राहुल कुल, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, जलसंपदा यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश भोसले, पानशेत व वरसगाव प्रकल्पाचे उपअभियंता मोहन भदाणे, पानशेत प्रकल्पाचे शाखाधिकारी अनुराग मारके आदी उपस्थित होते.


यावेळी मंत्री विखे- पाटील यांनी वीर बाजी पासलकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. वीर बाजी पासलकर यांच्या पुतळ्याचे, परिसराचा सुशोभीकरणाचा आराखडा करून त्याचे उत्कृष्ट काम करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
कपोले, गुणाले यांनी या धरण प्रकल्पांच्या बाबत त्यांचे बांधकामाचे वर्ष, बांधकामाचा प्रकार, साठवण क्षमता, जलविद्युत निर्मिती प्रकल्पांची वीजनिर्मिती क्षमता आदींच्या अनुषंगाने माहिती दिली. तसेच पानशेत मधील गाळ काढण्याचे काम नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असल्याचे सांगितले. दोन लाख घन मीटर गाळ काढण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

