२८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत १५३ उमेदवारांचे १६४ नामनिर्देशन पत्र दाखल
मुंबई, दि. २४: महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातून कालपर्यंत १५३ उमेदवारांचे १६४ नामनिर्देशन पत्र भरण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून २९ ऑक्टबरला नामांकन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जाची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.
