Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण तातडीने सुरू करण्याचे निर्देश

रत्नागिरी आणि लातूर येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था लवकरच सुरू करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई : सध्याची कोरोनाची स्थिती पाहता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्यातील सर्व राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण तातडीने सुरू करावे अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

आज राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व उर्वरित सर्व भारतीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रांचा आढावा आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याबाबत उच्च तंत्र शिक्षण मंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

सामंत म्हणाले, रत्नागिरी आणि लातूर येथे  राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था सुरू करण्यासंदर्भातील  प्रस्तावाच्या सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता करून लवकरच  संस्था सुरू करण्यात येईल.

दरवर्षी केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगातून निवड होणाऱ्या विद्यार्थांचा सत्कार राज्य शासनाकडून केला जावा. यावर्षी राज्यात कोविडचा प्रादुर्भाव असल्याकारणाने या निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थांचा सत्कार संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी समन्वय साधून आयोजित करावे अशा सूचनाही सामंत यांनी यावेळी दिल्या. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचे मनोबल उंचावण्यास मदत होईल.

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थांना सक्षमीकरणासाठी समिती गठित

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण चालू करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येईल. या समितीच्या मदतीने या सर्व संस्थांना येणाऱ्या आर्थिक अडचणी, प्राध्यापकांचे मानधन, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा याचा अभ्यास करून  संस्थांना अधिकाधिक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या सर्व संस्थांना अधिक सक्षम करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा  उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येथील. प्रत्येक जिल्ह्यात केंद्र निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यासाठी सकारात्मकपणे निर्णय घेण्यात येईल. सध्या प्रशासनात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशा सूचनाही सामंत यांनी यावेळी केल्या.  या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, संचालक डॉ. धनराज माने, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थांचे सर्व संचालक आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सिंधुदुर्गरत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा                

सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा आणि याबाबी अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.

मुंबई विद्यापीठ आणि जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत नाविन्यपूर्व योजनेतून स्पर्धा परिक्षा केंद्र सुरु करण्याबाबत आढावा घेण्यात आला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये  प्रायोगिक तत्वावर जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत निधी उपलब्ध करून देऊन या केंद्रांसाठी उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात यावीत असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर आणि संबंधित अधिकारी  उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *