राहुल गांधींनी घोषणा केली NYAY ‘न्याय’ ची
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा ज्वर जस-जसा तापत चालला आहे तस-तसे राजकीय पक्षांचे मतदारांना आकृष्ट करण्यासाठीचे घोषणाबाजी करण्याचे सत्र सुरू झाले आहे. आज दुपारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत अशीच एक मोठी घोषणा केली.
२०१९ ला सत्तेत आल्यास देशातील २० टक्के गरीब कुटुंबांना दरसाल ७२,०००/- रुपये देऊ असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. त्यासाठी ‘NYAY’ ‘न्यूनतम आय योजना’ या योजनेअंतर्गत देशातील जवळपास ५ कोटी कुटुंब म्हणजेच २५ कोटी लोकांना याचा थेट लाभ पोहोचेल असे ते म्हणाले. या योजनेबद्दल सविस्तर माहिती देताना ते म्हणाले की,”एका कुटुंबाला जगण्यासाठी १२,०००/- रुपयांची गरज असते. इतक्या रकमेची हमी या योजनेअंतर्गत आम्ही देणार आहोत. ही योजना जाहीर करण्यापूर्वी सर्व बाजूने विचार व अभ्यास केला गेला आहे आणि अशी योजना जगात कुठेही पाहायला नाही मिळणार”
काँग्रेस ने दोन दिवसांनी जाहीर होणाऱ्या त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्याची एक झलकच आज दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.