“हा मल्टीस्टारर सिनेमा नव्हे, हा तर हाॅरर सिनेमा आहे” देवेंद्र फडणवीस यांनी उडवली अशोक चव्हाणांच्या वक्तव्याची खिल्ली
नांदेड: माजी मुख्यमंत्री व सध्याचे विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज कार्यकर्ता मेळाव्या निमित्त नांदेड मध्ये आले होते. यावेळी त्यांनी कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांच्या कालच्या विधानाचा धागा पकडत तुफान फटकेबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा इतिवृतांत जसा च्या तसा.
“राज्यातील नव्या सरकारचा जन्म कसा झाला, हे आता पुन्हा सांगण्याची गरज नाही. विरोधाभासाचे हे सरकार, विचार, तत्वांना तिलांजली दिलेले. एकत्र लढून वेगळे होण्याची ही देशातील पहिली घटना !
हा मल्टीस्टारर सिनेमा नव्हे, हा तर हाॅरर सिनेमा आहे. लोकसभा हरल्यामुळे आता अशोकराव खुश असतील. किमान त्यांना मंत्री होता आले. तो आनंद सुद्धा किती काळ टिकेल, हे आज सांगता येत नाही. केवळ सत्तेसाठी एकत्र आले तर ते सरकार फार काळ टिकत नाही. एकत्र येण्यासाठी समाजकारण करावे लागते.
अशोकरावांना नेमके काय सांगायचे आहे? कालपर्यंत शिवसेना संविधानाप्रमाणे वागत नव्हती का? की उद्धवजी सोनियाजींच्या दरबारी खरोखर तसे पत्र घेऊन गेले. अशी लाचारीची स्थिती आमच्या जुन्या मित्रांवर येत असेल, तर त्याचे आम्हाला वाईट वाटते.
गरीबाची थट्टा कशाला करता?
1२ कोटींच्या महाराष्ट्रात १८ हजार लोकांना जेवण.
नांदेडमध्ये ५०० लोकांना.
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत.
भारतीय नागरिकत्व कायद्याबाबत हिंदूहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मान्य आहे की नाही, याचेही उत्तर आता शिवसेनेला द्यावे लागेल.
साऱ्या नागरिकांनी आज एकजूट होऊन मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे.”