विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली मुख्यमंत्र्यांना ‘ही’ विंनती
मुंबई/कोकण: काल आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण व नाशिक, पुणे भागत मोठं नुकसान झालं. याबाबत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याविषयात योग्य पावले उचलण्याची विनंती केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यात विशेषत: कोकणातील जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी, मासेमार, फलोत्पादक, छोटे दुकानदार, मूर्तिकार यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याने घरांचे आणि घरातील सामुग्रींचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने सर्वत्र तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. पुणे, नाशिक, मालेगाव या भागात सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. शेतमाल खरेदी होत नसल्याने आधीच शेतकरी त्रस्त आहे. आता प्रत्यक्ष हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे तातडीने नुकसानभरपाई द्यावी, ही राज्य सरकारला विनंती!”