“सहकाराचा स्वाहाकार होवू नये म्हणून, सहकारी संस्था बळकट करण्याची आवश्यकता” – देवेंद्र फडणवीस
नंदुरबार, दि.१९: सहकाराचा स्वाहाकार आणि अपहार होवू नये म्हणून, सहकारी संस्था अधिक बळकट करण्याची आवश्यकता विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ते काल नंदूरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात लोणखेडा इथं सहकार महर्षी पी. के. अण्णा पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर बोलत होते. सहकार क्षेत्रात साखर कारखाने अडचणीत असून, सरकारने त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं फडणवीस म्हणाले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना, महाआघाडीच्या मित्रपक्षामध्ये कुठलीही नाराजी नसून मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद इथं हैदराबाद मुक्तिसंग्रामदिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यात केलेल्या विधानाबाबत इतरांनी फार मनावर घेण्याची गरज नाही, असं म्हटलं आहे. सार्वजनिक ठिकाणी असं वक्तव्य करावं लागतं, असं सांगत, जयंत पाटील यांनी याबाबत अधिक बोलणं टाळलं.