जर वेळेत एसटी बसेस सोडता येत नसतील तर किमान ‘ट्रेन’ ने प्रवास करण्याची मुभा देण्याची प्रवाशांची सरकारकडे मागणी
मुंबई/पनवेल दि.७: कोरोना लॉकडाऊन च्या काळातही अत्यावश्यक सेवा तसेच खाजगी कार्यालयांतील अनेक जणं न चुकता कामावर जात आपलं कर्तव्य बजावत आहेत. यातल्या आरोग्यसेवा वगळता बाकीच्यांना उपनगरीय ट्रेन मध्ये प्रवेश निषिद्ध आहे. मग या ‘बिचाऱ्यां’ वर एसटी, बेस्ट बसेस व शेवटी खाजगी वाहनांतून प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध राहतो. पण यात सर्वात जास्त वाईट अनुभव हा राज्यशासनाच्या ‘एसटी’ बसेसच्या उपलब्धतेबाबत प्रवाशांना येत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र वार्ताच्या ‘आपली समस्या’ च्या टीम कडे गेल्या काही दिवसंपासून येत आहेत. ज्यात स्त्रियांच्या तक्रारींचे प्रमाण जास्त आहे.
दादर पोस्ट ऑफिस जवळील एसटी बस स्थानकावरून वाशी, बेलापूर, पनवेल, उरण या ठिकाणांसाठी रोज काही गाड्या सोडण्यात येत आहेत. पण या गाड्यांची उपलब्धता फार कमी असल्यामुळे सायंकाळी कार्यालये सुटण्याच्या वेळेला मोठ्या प्रमाणात प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. गाड्या चक्क दीड तास उशिराने येतात आणि हे रोजचंच असल्याच्या या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
मुळात ट्रेन मध्ये मर्यादित प्रवेश असल्यामुळे येथे गर्दी होते आणि त्यात एसटी प्रशासनाने बसेसची संख्याही कमी केलेली आहे. याचा सर्वात जास्त त्रास पनवेल व उरण इथल्या दूर वरच्या प्रवाशांना भोगावा लागतोय. आधीच कोरोनाच्या कहरामुळे तणावात असलेल्या या प्रवाशांना आपापल्या घरी पोहोचायलाही रात्रीचे दहा-अकरा वाजतात. महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम कडे ही समस्या आल्यावर आम्ही आमच्या एका प्रतिनिधीमार्फत याची खातरजमा केली तेव्हा त्यांनाही तसाच वाईट अनुभव आला. आम्ही मुंबई विभागातील एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे तसेच परिवहनमंत्री ऍड. अनिल परब यांचे या समस्येकडे लक्ष वेधून घेत आहोत. तरी या मार्गावर(दादर-पनवेल) विशेषतः सायंकाळच्या वेळेला ज्यादा बसेस सोडणे गरजेचे आहेत. नाहीतर सरकारने किमान ट्रेन ने प्रवास करण्याची मुभा तरी द्यावी.