विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांचे प्रतिपादन
मुंबई, दि. २३: विधानसभेचे आज दिसत असलेले निकाल पूर्णपणे अविश्वसनीय, अस्वीकारार्ह असून महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनांशी त्याचा काहीही ताळमेळ नाही, असं मत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. मतदानोत्तर कल चाचण्यांमध्येही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत होण्याचा अंदाज व्यक्त केला होता, मात्र प्रत्यक्षात आमचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. यावर विश्वास कसा ठेवायचा? लोकसभेच्या निवडणुकीत पाचच महिन्यांपूर्वी जनतेनं महाविकास आघाडीला भरपूर प्रतिसाद दिला, पाच महिन्यांत परिस्थिती इतकी कशी बदलेल, असा सवाल चेन्नीथला यांनी उपस्थित केला. या निकालामागची कारणं शोधण्यासाठी आम्ही खोलात जाऊ, तपास करू आणि पुन्हा जनतेसमोर येऊ, हा निकाल महाराष्ट्राच्या जनतेलाही मान्य होणारा नाही, असं प्रतिपादन त्यांनी केलं.
Source – AIR
