बीपीसीएल प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना सोसायटी बनवून प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्याचे मान्य
उरण दि. २९(विठ्ठल ममताबादे): १४ दिवसांच्या प्रचंड संघर्षानंतर अखेर बीपीसीएल प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना सोसायटी बनवून प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्याचे मान्य केले आहे. या बैठकीत परमनंट कामगारांचं काम जे बाहेरचे कान्ट्रॅक्ट लेबर्स करतात ते सर्व काम प्रकल्पग्रस्त सोसायटीच्या माध्यमातून करतील असे बैठकीत ठरले गेले. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांतर्फे राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील, उपसरपंच लक्ष्मण ठाकूर, प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष अनिल ठाकूर, एसीपी सावंत, वरिष्ठ पोलिस निरिक्षक रवींद्र बूधवंत, उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, बीपीसीएल टर्मिनल मॅनेजर सेंथिल आर., सुनिल कांबरे उपस्थित होते. खऱ्या अर्थाने हा प्रकल्पग्रस्तांचा विजय असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रशांत पाटील (राष्ट्रवादी कॅाग्रेस, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस) , ग्रामपंचायत भेंडखळ, ग्रामस्थ मंडळ भेंडखळ, भेंडखळ गावचे ग्रामस्थ, सर्व पक्षाचे पदाधिकारी, नेतेमंडळी, विविध सामाजिक संस्था-संघटना, युवा वर्ग यांनी प्रचंड मेहनत घेतली.या सर्वाचे जाहीर आभार प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती चे अध्यक्ष अनिल अशोक ठाकूर यांनी मानले आहे.
उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCl ) ही केंद्र सरकार पुरस्कृत कंपनी कार्यरत असून बीपीसीएल ने या प्रकल्पासाठी भेंडखळ गावातील २०७ एकर जमीन संपादित केली. त्याबदल्यात प्रकल्पग्रस्तांना नोकरीं व इतर आश्वासने देण्यात आली होती. मात्र स्थानिक बेरोजगार नोकरीपासून वंचीत होते. बेरोजगार प्रकल्पग्रस्तांनी कंपनी प्रशासनाशी अनेकवेळा पत्रव्यवहार केला पण बीपीसीएल कंपनी प्रशासनाकडून कोणतेही योग्य असा प्रतिसाद मिळाला नव्हता. भेंडखळ गावातील बेरोजगार प्रकल्पग्रस्त तरुणांना या कंपनीने कामावर रुजू करून घेण्यास विरोध दर्शविल्याने आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारत पेट्रोलियम प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती भेंडखळचे अध्यक्ष अनिल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पग्रस्तांनी बीपीसीएल गेटसमोर फिजिकल डिस्टन्स पाळून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून बेमुदत उपोषणाला दि.१५ मार्च रोजी सुरवात केली होती. अखेर बीपीसीएल कंपनी प्रशासनाने मागण्या मान्य केल्याने भेंडखळ प्रकल्पग्रस्तांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.
