३० जानेवारीपासून बार्टी कार्यालयासमोर अमरण उपोषण, राज्यातून संशोधक होणार सहभागी
पुणे, दि.२८: येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडे BANRF-2022 परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व पात्र संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मंजूर करून येत्या २९ जानेवारीच्या आत यादी बार्टीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, तसे न केल्यास येत्या ३० जानेवारीपासून बार्टीच्या कार्यालयासमोर जोपर्यंत सरसकट यादी मंजूर करून प्रसिद्ध करत नाही तोपर्यंत अमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा संशोधक कृती समिती-२०२१ चे संशोधक विद्यार्थी ईश्वर आडसूळ यांनी दिला आहे.
यासंदर्भात संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या वतीने याआधी अनेक वेळा बार्टी कार्यालयाला निवेदने देण्यात आलेली आहेत.तसेच वेळोवेळी उपोषणदेखील केले गेले आहे. त्यावेळी बार्टीच्या निबंधकांनी १२ ते १६ डिसेंबरदरम्यान संशोधक विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे पडताळणी करून पात्र ठरलेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेवून त्याचा अहवाल २० डिसेंबरपर्यंत शासनास पाठविण्यात येईल व सर्व पात्र विद्यार्थ्यांची यादी एकत्रितपणे बार्टीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे सांगितले होते. कागदपत्र पडताळणी व मुलाखती ही केवळ विहित प्रक्रियेचा भाग आहे, मुलाखती आधारे विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात येणार नाही, असे कळवून त्यावेळी आंदोलनकर्त्या संशोधक विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार संशोधकांनी कार्यालयीन पत्रावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेतले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पार पडली. बार्टीने सर्व पात्र संशोधक विद्यार्थ्याची यादी बार्टीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून तसा अहवाल शासनास सादर करणे आवश्यक होते. मात्र बार्टीने आपल्या आश्वासनाचे पालन न करता २०० विद्यार्थ्यांची निवड केली. निवड केलेल्या विद्यार्थ्यांची यादी तसेच पीएच. डी व एम.फिलसाठी कायम नोंदणी केलेल्या ६६२ संशोधक विद्यार्थ्यांची स्वतंत्र यादी शासनास पाठवून राज्यभरातील संशोधक विद्यार्थ्यांचा विश्वासघात आणि फसवूणक केली आहे, त्यामुळे बार्टीने येत्या २९ जानेवारीपर्यंत यादी जाहिर करावी, अन्यथा उपोषण करू, असेही बार्टी कार्यालयास २५ जानेवारी रोजी आंदोलनकर्ते ईश्वर आडसूळ यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.
संशोधक विद्यार्थ्यांत संतापाची लाट
बार्टीने संशोधक विद्यार्थ्यांना दिलेल्या आश्वासनामुळे आंदोलन मागे घेतले होते. परंतु जवळपास दीड महिना उलटला तरीदेखील बार्टीने सरसकट सर्व पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करून यादी अद्यापर्यंत संकेतस्थळीवर टाकलेली नाही. त्यामुळे बार्टीने दिलेल्या आश्वासनाची पुर्तता न केल्याने संशोधक विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. सारथी व महाज्योतीने सर्व अर्ज केलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना फक्त कागदपत्रे तपासून फेलोशिप मंजूर केली. मग, अनुसूचित जातीच्याच विद्यार्थ्यांना का वेठीस धरले जात आहे, असा सवालही संशोधक विद्यार्थी ईश्वर आडसूळ यांनी उपस्थित केला आहे.