बीड मधील पूरस्थितीत भारतीय लष्कराकडून त्वरित बचाव मोहीम
बीड, दि. १५: महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे अवघ्या काही तासांतच अनेक गावांना पुराचा वेढा पडला आणि यात कुटुंबे अडकली. या आपत्कालीन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय सैन्याने प्रशासकीय यंत्रणेसोबत सातत्याने समन्वय साधून अविश्रांत मदत कार्य सुरु केले.

यासाठी दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स ब्रिगेडचे आर्मी एव्हिएशन हेलिकॉप्टर अल्पावधीतच तैनात करण्यात आले. खराब हवामान आणि प्रतिकूल उड्डाण परिस्थितीचा सामना करत, वैमानिकांनी अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पूरग्रस्त भागात उड्डाण केले. महिला, लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलवले जात असून बचावकार्यासाठी सतत उड्डाणे सुरू आहेत.
एन डी आर एफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्यातील संस्थांसोबत समन्वय साधत भारतीय लष्कराने केलेल्या या कामगिरीतून नागरिकांचे रक्षण आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात तात्काळ मदत पुरवण्याबद्दलची त्यांची अढळ वचनबद्धता दिसून येते.
