विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर घेतला निर्णय
ठाणे, दि. १४: विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकी सोडण्याची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटाला विरोध केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात जामिन मिळाल्यानंतर काही वेळातच एका कार्यक्रमानंतर भाजपशी संबंधित एका महिलेकडून विनयभंगाचा आरोप करण्यात आला. मुंब्रा येथील नवीन पुलाच्या उद्घाटनावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सदर महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ही घटना १३ नोव्हेंबरची आहे. त्या दिवशी मुंब्रा येथील एका पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. पीडित महिला मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पुढे जात होती. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी महिलेसह अनेक लोक मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी निघाले होते.
महिलेच्या या आरोपानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, पोलिसांनी माझ्यावर ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या अत्याचाराविरुद्ध मी लढणार आहे. आमदारकीचा राजीनामा देण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीची हत्या आपण पाहू शकत नाही.