औरंगाबाद जिल्ह्यातली सर्व पर्यटनस्थळे उद्या १० डिसेंबर पासून पर्यटकांसाठी खुली होणार
औरंगाबाद जिल्ह्यातली अजिंठा, वेरूळ आणि दौलताबादच्या किल्ल्यासह सर्व पर्यटनस्थळे, उद्या १० डिसेंबर पासून पर्यटकांसाठी खुली होणार आहेत. त्यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते.
या सर्व पर्यटनस्थळी दर दिवशी सकाळच्या सत्रात एक हजार आणि दुपारच्या सत्रात एका हजार अशा एकूण दोन हजार पर्यटकांना, दररोज मर्यादित प्रवेश दिला जाईल. पर्यटनस्थळांवर प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक असून, पर्यटकांना ऐन वेळेवर तिकिट काढता येणार नाही.
गाईड, दुकानदार, स्थानिक कारागीर, हॉटेल चालक, वाहतुक व्यावसायिक या सर्व संबंधितांची, कोविड चाचणी त्या-त्या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी करण्याची सुविधा, संबंधित यंत्रणेने तातडीने उपलब्ध करून द्यावी, पर्यटनस्थळी टुरिस्ट गाईड यांनी पर्यटकांकडून संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करून घ्यावे, वेरूळ अजिंठा इथे प्रवासी वाहतूक बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.