इच्छुक खरेदीदारांना एफसीआय ई-लिलाव साइटवर नोंदणी करणे आवश्यक
महाराष्ट्र प्रदेश, गोवासाठी २०,००० मेट्रिक टन तांदूळ साठा उपलब्ध करून देण्यात येत आहे
मुंबई, दि. ६: भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने ऑगस्ट २०२४ च्या पहिल्या आठवड्यापासून खुल्या बाजार विक्री योजना-देशांतर्गत (ओएमएसएस-डी) द्वारे तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे.
तांदूळ साठा खरेदी करण्यास इच्छुक असलेले खरेदीदार एफसीआय च्या ई-लिलाव सेवा प्रदात्याच्या “m-Junction Services Limited” https://www.valuejunction.in/fci/ वर नोंदणी करून साठ्यासाठी बोली लावू शकतात. नोंदणी इच्छुक खरेदीदारांची नोंदणी प्रक्रिया ७२ तासांच्या आत पूर्ण केली जाईल.
७.०८.२०२४ रोजी होणाऱ्या आगामी लिलावासाठी गोवा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशात एकूण २०,००० मेट्रिक टन तांदळाचा साठा उपलब्ध करण्यात येत आहे. व्यापारी/ घाऊक खरेदीदार/ तांदूळ उत्पादक या लिलावात सहभागी होऊ शकतात. तांदूळासाठी प्रत्येक बोलीदाराची किमान बोली १० मेट्रिक टन असेल आणि त्याला कमाल बोली १००० मेट्रिक टन पेक्षा जास्त लावता येणार नाही. ओएमएसएस (डी) योजना चढ्या किंमती आटोक्यात ठेवण्यास मदत करेल आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा देईल.
ओएमएसएस
महागाई रोखण्याच्या उद्देशाने कमी किमतीत अन्नधान्य उपलब्ध करून बाजारातील किमती नियंत्रणात ठेवण्याकरिता ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ई-लिलावाद्वारे निश्चित केलेल्या किंमतींनुसार खुल्या बाजार विक्री योजना (ओएमएसएस) – देशांतर्गत द्वारे अन्नधान्य (गहू आणि तांदूळ) खुल्या बाजारात उपलब्ध करून दिले जाते.
या योजनेअंतर्गत, भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) माध्यमातून केंद्र सरकार, ई-लिलावाद्वारे खाद्यान्न प्रक्रिया उद्योजक/पीठ गिरणी उद्योजक/केवळ गव्हापासून तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनांचे उद्योजक (व्यापारी/घाऊक खरेदीदारांना परवानगी नाही) यांना गहू उपलब्ध करून देते. गव्हाच्या बाबतीत पात्र बोलीदार किमान १० मेट्रिक टन तर कमाल १०० मेट्रिक टनापर्यंत बोली लावू शकतो. तांदळाच्या बाबतीत, व्यापारी पात्र आहेत आणि किमान १० मेट्रिक टन आणि कमाल १००० मेट्रिक टन बोली लावू शकतात.
