शरद पवार धमकी प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सरकारकडे मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली. या घटनेची तातडीने दखल राज्याच्या प्रमुखांनी घ्यायला हवी तसेच यावर कडक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. केवळ लिखाण आहे म्हणून साधी कलमे लावून संबंधित व्यक्तीला सोडण्याचा प्रयत्न करू नये, अशी विनंतीही त्यांनी केली. असे विचार करणारी जी प्रवृत्ती आहे त्यास पूर्ण प्रायश्चित देण्याचे काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व गृहमंत्र्यांनी करावे, अशी मागणी त्यांनी केली.
नरेंद्र दाभोलकर हे पुरोगामी विचार खंबीरपणे मांडत होते. सनातनी प्रवृत्तीच्या लोकांना त्यांची अडचण झाली होती. पवार साहेबांनीदेखील राज्यात आणि देशात पुरोगामी विचारांची कास धरून काम केले आहे. हा नेता काहींना आपल्या मार्गातील अडथळा वाटत आहे. हा विचार एका व्यक्तीचा नसून राज्यातील सनातनी प्रवृत्तीच्या काही लोकांचा विचार आहे. जर पोलिस प्रशासन यावर योग्य कारवाई करणार नसेल तर नेमकं काय करायचं हे जनताच ठरवेल, असा इशारा जयंत पाटील यांनी राज्यकर्त्यांना केला.
राज्यातील तणावग्रस्त परिस्थितीबाबत पवार साहेबांनी पुढाकार घेऊन अनिष्ट प्रवृत्तीला लवकर आळा घालण्याची मागणी केली आहे. राज्यात दंगली घडवल्या तर कोणाचा फायदा होतोय हे जगजाहीर आहे. राज्यात आपली लोकप्रियता कमी झाली आहे, ती सावरण्यासाठी काही लोक असा प्रयत्न करत असतील. मात्र शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा चुकीचा प्रयत्न करणार नाहीत. पवार सर्व समाजांना बरोबर घेऊन चालत आहेत याची लोकांना खात्री आहे. पवार विरोधी पक्षांचे शक्तीस्थान आहेत. त्यांना नामोहरम करून राज्यातील युवकांना वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न या प्रवृत्तीचे लोक करत आहेत, असे ते म्हणाले.
राज्यात मागील काही दिवसांपासून दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका निर्माण झाली आहे. राज्यातील गृहमंत्र्यांनी जबाबदारीने सर्वांमध्ये शांतता राहील अशी पावले उचलली पाहिजेत. दोन समाजात तणाव निर्माण होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.