भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी कार्यकर्ता गौतम नवलखा यांना दिलासा दिल्याचा न्या. एस. मुरलीधर यांच्यावर केला होता आरोप
नवी दिल्ली/मुंबई, दि. ६: काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या २०१८ च्या आरोपांसाठी दिल्ली उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. त्यांनी न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्यावर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी कार्यकर्ता गौतम नवलखा यांना दिलासा देत पक्षपातीपणा केला असल्याचा आरोप केला. वास्तविक, न्यायालयाने गौतम नवलखा यांची नजरकैद आणि ट्रान्झिट रिमांड रद्द केला होता, त्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती.
त्याच वेळी, न्यायमूर्ती एस. मुरलीधर (सध्या ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश) यांच्या विरोधात केलेल्या टिप्पणीची दखल घेत न्यायालयाने विवेक अग्निहोत्री, लेखक आनंद रंगनाथन आणि न्यूज पोर्टल स्वराज्य यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई सुरू केली होती. आज, चित्रपट निर्मात्याने आपल्या वकिलामार्फत न्यायालयात माफीचे प्रतिज्ञापत्र सादर केले आणि सांगितले की त्यांनी वादग्रस्त ट्विट हटवले आहे. मात्र, या खटल्यासाठी न्यायालयाने नियुक्त केलेल्या वकिलाने अग्निहोत्रींनी तो काढला नसून ट्विटरने तो काढल्याचे सांगितले. यावर अग्निहोत्रींच्या वकिलाने सांगितले की, ते ट्विट कधी ब्लॉक झाले याची चौकशी करू.
न्यायालयाने विवेक अग्निहोत्री यांना १६ मार्च रोजी वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने सांगितले की, हे प्रकरण न्यायालयाने स्वत:हून सुरू केले आहे, यासाठी विवेक अग्निहोत्री यांना पुढील तारखेला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.