उरण एस.टी. आगारातील बस गाड्यांची संख्या व फेऱ्या वाढविण्याची शेकापची मागणी
उरण, दि. १७ (विठ्ठल ममताबादे) : उरण आगारात कोरोना काळ संपल्यावर देखील कमी झालेल्या गाड्यांची संख्या अजूनपर्यंत न वाढवल्यामुळे विविध मार्गावर फेऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. एस.टी. गाड्यांची संख्या वाढविण्यासाठी तसेच विविध मार्गावर जास्तीत जास्त फेऱ्या वाढवाव्यात यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शहर चिटणीस शेखर पाटील यांनी शिष्टमंडळ समवेत डेपो मॅनेजर सतीश मालचे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. उरण तालुक्यातील गावांना सोडणाऱ्या बसेस, पनवेल व दादर मार्गावरील गाड्या, पहाटे साडेचार वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंतच्या फेऱ्या सध्या बंद आहेत. तसेच लांब पल्ल्याच्या ठराविक गाड्या वगळता बसेस बंद आहेत. याचा फटका विद्यार्थी कामगार वर्ग व प्रवाशी वर्ग यांना बसतो आहे. सर्वसामान्य माणसाला परवडेल अशी बससेवा नियमितपणे चालू नसल्याने प्रवासी वर्गाची नाराजी आहे.
कोरोना काळाच्या आधी एकूण ५२ बसेस असताना त्या सध्या ३९ असल्याचे डेपो मधून सांगण्यात आले. यामुळे उरण डेपोच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढवावी, फेऱ्या वाढवाव्यात. तसेच करंजा ते मोरा अशी बससेवा सुरू करावी. गौरी गणपती सणानिमित्त कोकणात व घाटमाथ्यावर गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांच्या वतीने करण्यात आली. उरण एसटी डेपोचे व्यवस्थापक सतीश मालचे यांनी एसटी गाड्या वाढविण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस शेखर पाटील, तालुका सहचिटणीस यशवंत ठाकूर, तालुका महिला आघाडी अध्यक्षा सीमा घरत, शहर अध्यक्षा नयना पाटील, शहर उपाध्यक्षा रंजना पाटील, शहर पदाधिकारी शंकर भोईर, दिलीप पाटील उपस्थित होते.