मुंबई, दि. ३ : राज्यातील गृहनिर्माण संस्थांचे मानिव अभिहस्तांतरणासाठी (डीम्ड कन्व्हेअन्स) लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली असून याप्रक्रियेत सुसूत्रता आणली आहे, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे.
सदस्य संजय पोतनिस यांनी राज्यातील गृहनिर्माण संस्थांची मानिव अभिहस्तांतरण प्रकरणी प्रलंबित असल्याबाबत प्रश्न विचारला होता. त्याच्या लेखी उत्तरात सहकार मंत्री पाटील यांनी म्हटले आहे की, राज्यातील संबंधित जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात ३१ जानेवारी २०२१ पर्यंत मानिव अभिहस्तांतरणाचे १४ हजार ८२२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १३ हजार ६५५ अर्जांवर कार्यवाही करुन प्रमाणपत्र देण्यात आले आहे. उर्वरित ११६७ अर्जांवर कार्यवाही सुरु असल्याचे पाटील यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.
