NMMT च्या सर्व बसेस कायमस्वरूपी पेन्शनर्स पार्क येथून सोडाव्यात – उरण तालुका काँग्रेसची मागणी
उरण, दि.५(विठ्ठल ममताबादे): उरण मधून नवी मुंबई, मुंबईला जाण्यासाठी तसेच मुंबई, नवी मुंबई मधून उरण तालुक्यात येण्यासाठी नवी मुंबई परिवहन सेवे (NMMT) च्या बसेस चा प्रवाशांना खूप मोठा आधार आहे. उरण मधील सर्वसाधारणपणे ६०% प्रवासी हे NMMT ने प्रवास करतात. मात्र NMMT च्या सर्व बसेस पेन्शनर्स पार्क येथून न सोडता उरण चारफाटा येथून सोडल्या जात आहेत. त्याचा खूप मोठा फटका कर्मचारी वर्गांना, प्रवासी वर्गांना बसत आहे. पूर्वी बसेस कायम स्वरूपी उरण शहरातील पेन्शनर्स पार्क येथून सोडल्या जात होत्या. मात्र मध्यंतरी रस्त्याचे काम चालू असल्याने या सर्व बसेस उरण चारफाटा येथून सोडल्या जाऊ लागल्या. आता मात्र NMMT च्या सर्व बसेस पेन्शर्स पार्क येथून सोडण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशी वर्ग, कर्मचारी वर्गातून करण्यात येत आहे. या प्रवाशांच्या मागणीचा विचार करत उरण शहर काँग्रेस कमिटीने प्रवाशांची ही मागणी पूर्ण करावी असे निवेदन प्रशासनाला दिले आहे.
अनेक दिवसापासून पहाटे ५ ते सकाळी ९:३० व संध्याकाळी ७ ते १० दरम्यान NMMT (नवी मुंबई परिवहन सेवा) च्या बसेस उरण शहरातील पेन्शनर्स पार्क मध्ये थांबवल्या जातात. इतर वेळेत या बसेस उरण मधील चारफाटा येथे थांबतात. सकाळी व संध्याकाळीची वेळ सोडून इतर वेळेत येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची, विद्यार्थ्यांची, जेष्ठ नागरिक, कामगार वर्ग आणि अन्य प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांना ५० ते १०० रुपयापर्यंत नाहक खर्च सहन करावा लागत आहे. सदर बाब उरणच्या प्रवाशांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची व त्याच सोबत खर्चीक असल्याने उरणच्या जनतेत असंतोष पसरला आहे. तसेच रोड वायडींगचे काम झाल्यामुळे रस्त्याच्या अडचणीचाही विषय संपलेला आहे. त्यामुळे नवी मुंबई परिवहन सेवे (NMMT) च्या सर्व बसेस पेन्शनर्स पार्क येथून सोडाव्यात, सर्व फेऱ्या पेन्शनर्स पार्क येथून सुरु कराव्यात अशी मागणी उरण शहर काँग्रेस कमिटी तर्फे कमिटी अध्यक्ष प्रकाश अनंत पाटील यांनी उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उरण शहर काँग्रेस कमिटी तर्फे निवेदना द्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे. शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील, उपाध्यक्ष गुफारान तुंगेकर, उपाध्यक्ष जितेश म्हात्रे, शहर काँग्रेस उपाध्यक्ष रवी मढवी, जयवंती गोंधळी, चंदा मेवती आदी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी सदर समस्येबाबत प्रशासनाला निवेदन दिले आहे.
