Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“राज्य उत्पादन शुल्क विभागातील वर्ग ३ आणि ४ ची ६६७ पदे लवकरच भरणार” – मंत्री शंभूराज देसाई

“राज्य उत्पादन शुल्क विभागातील वर्ग ३ आणि ४ ची ६६७ पदे लवकरच भरणार” – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. २०: राज्य उत्पादन शुल्क विभागात येत्या ५ महिन्यांत वर्ग ३ आणि ४ च्या पदांची भरती केली जाणार असून एकूण ६६७ पदे भरण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, छगन भुजबळ, जयकुमार रावल यांनी याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

मंत्री देसाई म्हणाले की, राज्य उत्पादन शुल्क विभागात प्रथमच इतकी मोठी पदभरती केली जात आहे. टीसीएस या कंपनीमार्फत ही पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याशिवाय या विभागासाठी २९० पदांच्या भरतीची मागणी करण्यात आली असून यापैकी ११४ पदांची मागणी मंजूर करण्यात आली आहे. तर उर्वरित १७६ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुन्हे नोंदविण्याच्या संख्येत ७.६ टक्क्यांवर वाढ झाली आहे. याशिवाय आरोपी पकडण्याचे प्रमाण ३१.२६ टक्के आहे तर मुद्देमाल जप्त करण्याचे प्रमाण २१.१६ टक्के आहे. राज्यात सध्या ५७ भरारी पथके कार्यरत आहे तर १२ तपासणी नाके असून येत्या काळात १३ तपासणी नाके वाढविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

मंत्री देसाई म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यातील अनधिकृत मद्य कारखान्यांबाबतची माहिती घेऊन याबाबत कारवाई करण्याचे निर्देश तत्काळ देण्यात येतील. मोह फुलांपासून चांगल्या प्रतीची वाईन करता येईल का याबाबतचा अभ्यास ४ मद्यनिर्मिती कंपनी करीत आहे. याबाबतचा सूचना त्यांच्याकडून आल्यानंतर याबाबतचा विचार करण्यात येईल. मध्यप्रदेश, गुजरात आणि गोवा येथून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अवैध मद्याची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या चालक, मालक आणि सूत्रधार यांना अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.

गुन्हेगारांची माहिती देण्यासाठी पोलिसांकडून खबरींसाठी बक्षीस योजना असते त्याच धर्तीवर राज्य उत्पादन शुल्कात अवैध दारु वाहतुकीबाबत माहिती देणाऱ्यांना बक्षीस देण्याबाबतची योजना आणण्याचे प्रस्तावित आहे. यापुढे क्षेत्रिय अधिकाऱ्यांनाही अनधिकृत कारखान्यांबाबत कारवाई न केल्यास जबाबदार धरण्यात येईल. खारघर आणि नवी मुंबई येथील अवैध दारु वाहतुकीबाबत महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, १९४९ प्रकरणी जप्त केलेल्या मुद्देमालाची वाहनासह एकूण किंमत अंदाजे ७६.७७ लाख इतकी आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून या गुन्ह्याचा अधिक तपास करण्यात येत असल्याचे देसाई यांनी सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *