शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजपला खोचक सवाल
मुंबई दि.२३: काल नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांचा शपथविधी समारंभ संसदेत पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी व काँग्रेसच्या राजीव सातव यांनी मराठीत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व भाजपच्या उदयनराजे भोसले यांनी अनुक्रमे हिंदी व इंग्रजी मध्ये शपथ घेतली.
यावेळी उदयनराजे भोसले यांनी शपथ छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण केले ज्यांनंतर लोकसभा अध्यक्ष व्यंकैय्या नायडू यांनी यावर ताकीद देत माझ्या सदनात अशी कृती चालणार नाही असे बजावले. या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले. भाजपच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या प्रेमाबद्दल शंका उपस्थित केल्या गेल्या. सोशल मीडिया वर तर भाजपला महाविकास आघाडीच्या समर्थकांकडून ट्रोल करण्यात येत आहे. यात आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उडी मारली असून त्यांनी एक ट्विट करत भाजपला खोचक सवाल विचारला आहे. ते म्हणतात, “छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्या कडून सांगली सातारा बंदची अदयाप घोषणा नाही…
जय भवानी!
जय शिवाजी!!!!!!!”
साधारण ६ महिन्यांपूर्वी खा. संजय राऊत आणि खा. उदयनराजे भोसले यांच्यात खडाजंगी झाली होती. त्यावेळी संजय राऊत यांना बॅकफूट ला जावे लागले होते. पण कालच्या घटनेमुळे राऊत यांनी भाजपवर व उदयनराजें वर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली आहे.