इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (ट्रीपल आयटी), नागपूर, स्थायी परिसरचा लोकार्पण सोहळा संपन्न
नागपूर, दि. २४: माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान हे देशाचे भविष्य असून जगातील सर्वात प्रतिभावान तरुण अभियांत्रिकी मनुष्यबळ भारताकडे आहे. विश्वाला एक नवीन दिशा देईल अशी क्षमता भारतामधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मनिर्भर भारत, 5 ट्रिलियन डॉलर इकॉनोमी,जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अजून प्रगती होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी इंडियन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या नागपूरच्या वर्धारोड स्थित संस्थेच्या वारंगा (कॅम्पस) परिसराच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इंडियन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूरचे संचालक डॉ. ओ. जी.काकडे उपस्थित होते.
भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा दर्जा हा उंच असा असून याचीच प्रचिती नागपूर येथील मिहान मध्ये दिसून येते. टीसीएस,एचसीएल,टेकमहिंद्रा यासारख्या कंपन्या आपले उत्पादन,संशोधन आधारित कार्य येथे पूर्ण करीत आहेत. राफेल विमान निर्मिती, डसॉल्ट एव्हीएशन कंपनीचे 13 सीटर फाल्कन जेट मिहान मध्ये तयार होत आहे. मिहान मधील हवाई क्षेत्रात एमआरओ उभारून दर महिन्याला वीस इंडिगो फ्लाईट सर्विसिंग साठी तिथे येत आहेत. त्याचप्रमाणे एअरबस आणि बोईंग कंपनीचे पार्ट्स निर्मिती मिहान मधे होत आहे. सर्व उच्च दर्जाच्या माहिती तंत्रज्ञान, मनुष्यबळ, पायाभूत सुविधा मिहान मधे उपलब्ध आहेत.जगात आता नागपूरची ओळख ही आयटी हब म्हणून होत आहे , असे गडकरींनी यावेळी नमुद केले.
मिहान स्मार्टसिटी साठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येऊन उच्च दर्जाचे राहणीमान, मूलभूत सोईसुविधा, जागतिक दर्जाचे बांधकाम, त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. भांडवली गुंतवणुकी शिवाय रोजगार निर्मिती शक्य नसून यासाठी सुद्धा प्रयत्न व्हायला हवे परदेशातील प्रसिद्ध कंपन्या आपल्या इथे आपले कार्य आपले विस्तार करण्यासाठी यायला हव्या यासाठी त्यांना उच्च दर्जाची तंत्रज्ञान सुख सोयी सुविधा वेळेवर आणि सहजरीत्या उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. गुगल सोबत इंडियन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकार अंतर्गत सांमजस्य करार केलेला आहे ही एक ही संस्थेसाठी आणि विशेषतः नागपूरसाठी गौरवाची बाब आहे.
F9PM.jpeg)
इंडियन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने आपल्या परिसरात नागपुरातील विविध इंजिनिअरिंग कॉलेजना बोलवून त्यांना आपल्या कार्याची संशोधनाची माहिती द्यावी. मिहान मधील आयटी इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूरातील अभियांत्रिकी कॉलेजचे प्राचार्य, विद्यापीठाचे कुलगुरू यांनी विदर्भातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्र अजून विकसित होईल यासाठी आता स्वतःहून पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. नवकल्पना, उद्यमशीलता, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संशोधन कौशल्य आणि यशस्वी सराव या सर्व गोष्टींचा समन्वय साधून आपण आपली प्रगती केली पाहिजे.
सहकार्य ,समन्वय आणि संवाद या तिन्ही गोष्टींची गरज प्रत्येक क्षेत्रात आहे आपापल्या क्षेत्रातील दिग्गज लोकांनी एकत्र येऊन विकासात हातभार लावावा असे आवाहनही गडकरींनी यावेळी केले. नागपूर शहरात एम्स, आयआयएम, लॉ युनिव्हर्सिटी यानंतर इंडियन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सारखी एक राष्ट्रीय संस्था आलेली आहे ही नागपूरसाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात या संस्थेला 100 एकर जागा उपलब्ध करून दिली ही आपल्यासाठी सुद्धा एक अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी केले.
वर्तमानात प्रत्येक खेड्यात फायबर ऑप्टिकचा प्रसार होऊन माहिती तंत्रज्ञान देवाण-घेवाण सुलभ झालेली आहे. भारताने 5G तंत्रज्ञान जगासोबत एकाच वेळेवर सुरू केले. परंतु 6G तंत्रज्ञानाच्या वेळी भारत हा जगाच्या पुढे राहील असा विश्वास सुद्धा फडणवीस यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञान क्षेत्राने व्यवसाय सुलभीकरण, पारदर्शक व्यवहार्यता खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रात आणलेली आहे.

नुकताच गुगल सोबत महाराष्ट्र सरकारचा सामंजस्य करार झालेला असून या अंतर्गत इंडियन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स तयार होत आहे या सेंटरचे ब्रीद वाक्य ‘ए आय फोर सोशल गुड ‘ असे आहे. यापूर्वी आयआयएम नागपूर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता वर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स उभारून गुन्हेगारी आणि अपराध क्षेत्रातील तपासाला नागपूर पोलीस विभागाला मदत करीत आहे डीपटेक आणि डीपफेक कृत्रिम बुद्धिमत्तेचे दोन्ही पैलू आपण विचारात घेतले पाहिजे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई येथे पार पडलेल्या टेकवीक मध्ये मुंबई मेगापोलीस मेटावर्समध्ये मुंबईतील प्रकल्पांची माहिती देण्यात आलेली आहे या अंतर्गत आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवर मुंबईत होणाऱ्या प्रकल्पाची सर्व माहिती घेऊ शकतो याच मंचावर यापुढे प्रकल्पाची सर्व माहिती, जमीन हस्तांतरण करण्याचे परवाने आणि इतर सेवा ऑनलाइन रित्या मिळतील असेही त्यांनी सांगितले. 48 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला इंडियन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेचा प्रवास आज 2 हजार क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. संस्थेच्या कार्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना वीस लाखापर्यंतचे पॅकेज उपलब्ध होत होते जे आज 90 लाखापर्यंत गेलेले आहे. तसेच सुरुवातीला 24 कंपन्या प्लेसमेंट साठी संस्थेत येत होत्या आणि आज 168 कंपन्या प्लेसमेंट साठी येत आहे.
संस्थेने 299 रिसर्च पेपर आणि विविध पेटंट मिळवलेले आहेत. तसेच डीआरडीओ आणि विविध राष्ट्रीय संस्थेसोबत कार्य करत आहेत अशी माहिती इंडियन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूरचे संचालक डॉ. ओ.जी. काकडे यांनी दिली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर (IIITN) ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी योजनेअंतर्गत स्थापन केलेल्या 20 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थांपैकी एक आहे. IIIT, नागपूरला भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) अधिनियम, 2017 च्या तरतुदींनुसार “राष्ट्रीय महत्त्वाची संस्था” म्हणून घोषित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला संस्थेचे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.
