केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड राहणार उपस्थित
देवगिरी, दि. १७ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम हा स्वातंत्र्ययुद्ध अध्यायातील एक सुवर्णाध्याय आहे. दि.१७ सप्टेंबर २०२२ रोजी मराठवाडा स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग झाल्याच्या ऐतिहासिक घटनेला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत.हे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागातर्फे शनिवार, दि. १७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ०९.०० वा. देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी स्थित भारतमाता मंदिर प्रांगणात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजारोहण व राष्ट्रगीत गायन, मराठवाडा स्वातंत्र्य सेनानींचा सन्मान आणि सामूहिक वन्दे मातरम् गायन, भारतमातेची आरती, मराठवाडा मुक्ती संग्रामावर आधारित पोवड्याचे सादरीकरण असे या कार्यक्रमाचे स्वरूप असेल.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठवाडा स्वातंत्र्यलढ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनी देखील उभारण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष २०२२ २०२३ निमित्त पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पर्यटन विभाग, यांचे वतीने दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यामधील भारत माता मंदिराच्या प्रांगणात दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी मान्यवरांचे मार्गदर्शन व स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास मंगल प्रभात लोढा मंत्री, पर्यटन कौशल्य विकास व महिला बालकल्याण, महाराष्ट्र राज्य तसेच भागवत कराड, अर्थराज्यमंत्री, भारत सरकार नवी दिल्ली हे उपस्थित राहणार आहेत. सदरील कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र दर्डा एडिटर इन चीफ लोकमत व विशेष अतिथी म्हणून देवजी पटेल हे देखील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी श्रीमती ताराबाई लड्डा ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, मराठवाडा मुक्ती संग्राम व डॉ. शिरीष खेडगीकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सदर कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. सदरील कार्यक्रमास विशेष वक्ता म्हणून ॲड. आशिष जाधवर हे मराठवाडामुक्ती संग्रामची माहिती सांगणार आहेत.
मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमांमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम वर आधारित पोवाड्याचे सादरीकरण आदित्य लिंगायत व संच हे करणार आहेत. तसेच सामूहिक स्वरूपात वंदे मातरम हे गीत पद्मश्री केंदे व संच हे करणार आहेत. या कार्यक्रमास औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालयाचे ५०० विद्यार्थी व टूर ऑपरेटर्स, इतर नागरिक असे अंदाजीत ६०० लोक उपस्थिती लावणार आहेत. या कार्यक्रमानिमित्त मराठवाड्यातील संस्कृती व पर्यटन स्थळावर पर्यटन विभागामार्फत ध्वनिमुद्रित करण्यात आलेल्या गीताचे लोकार्पण हे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाची सांगता सामूहिक स्वरूपात वंदे मातरमने होणार आहे.
तरी पर्यटन संचालनायमार्फत नागरिकांना सदरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. श्रीमंत हारकर, उपसंचालक, प्रादेशिक पर्यटन संचालनालय, औरंगाबाद यांनी केले आहे.