देशातल्या नागरीकांसाठी १ लाख ७० हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज; पहा नेमकं कोणाला काय मिळणार
नवी दिल्ली: कोविड१९ च्या साथीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व्यवहार थंडावल्यानं रोजगाराला मुकलेल्या गरीबांना मदतीचा हात देण्यासाठी केंद्र सरकारने १ लाख ७० हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर केलं आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज ही माहिती दिली.
याअंतर्गत गरीबांना पुढचे तीन महिने प्रति व्यक्ती ५ किलो गहू किंवा तांदूळ मोफत मिळणार आहे. याशिवाय पुढे तीन महिने प्रति कुटुंब १ किलो डाळ मोफत दिली जाणार आहे.
मनरेगामधली रोजंदारीची रक्कम १८२ रुपयांवरून वाढवून २०२ रुपये करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठीच्या किसान सन्मान योजने अंतर्गत दरवर्षी देण्यात येणाऱ्या ६ हजार रुपयांपैकी २ हजार रुपयांचा पहिला हप्ता महिनाअखेर पर्यंत जमा केला जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
तर निराधार ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विधवांच्या खात्यात १ हजार रुपये मानधन २ टप्प्यांत जमा करण्यात येईल.
२० कोटी महिलांच्या जनधन खात्यात पुढचे ३ महिने प्रत्येकी ५०० रुपये अनुदान दिले जाणार आहे.
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी असलेल्या कुटुंबांना पुढचे दर महिन्याला एक याप्रमाणे पुढचे ३ महिने सिलेंडर मोफत मिळेल.
दीनदयाल ग्रामीण उपजीविका योजने अंतर्गत ६३ लाख महिला स्वयंसहाय्यता गटांना २० लाख रुपये पर्यंत विनातारण कर्ज मिळू शकेल. याचा लाभ सुमारे ७ कोटी कुटुंबांना होईल.
संघटित कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचे ३ मासिक हप्ते सरकार भरेल. किमान १०० कामगार काम करत असलेल्या आस्थापनांमधल्या आणि ९५ टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन १५ हजार पेक्षा कमी असणाऱ्या कंपन्यांना याचा लाभ मिळेल.
याशिवाय भविष्य निर्वाह निधीतून दिल्या कर्जाच्या नियमांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. त्यानुसार कामगारांना त्यांनी जमा केलेल्या पैशांच्या ७५ टक्के किंवा ३ महिन्याचा पगार यापैकी जी कमी असेल तितकी रक्कम विनापरतावा कर्ज म्हणून काढता येणार आहे.
बांधकाम मजुरांसाठीच्या कल्याण निधीचा वापर राज्यसरकारांनी त्यांच्या मदतीसाठी करावा असे निर्देश केंद्राने दिले आहेत.
याशिवाय वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, नर्स आणि इतरांसाठी केंद्र सरकारने ५० लाखांच्या वीम्याची घोषणा केली आहे.