आकडा वाढतोय : कोरोना बाधितांची संख्या देशात ५ हजार ७३४ तर राज्यात १ हजार २९७ – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
देशात कोरोना बाधितांची संख्या आता ५ हजार ७३४ झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीत म्हटलं आहे. आतापर्यंत या आजारानं देशात १६६ जण मरण पावले आहेत. त्यात सर्वाधिक ७२मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. राज्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या १ हजार २९७ झाली आहे. राज्यभरात १६२ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. एका दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. यापैकी १४३ रूग्ण एकट्या मुंबईचे आहेत. कल्याण-डोंबिवली चार, पुणे- तीन, पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबई- प्रत्येकी दोन, तर यवतमाळ, ठाणे, मीरा भाईंदर, वसई-विरार आणि सिंधुदुर्ग इथं प्रत्येकी एक नवीन रूग्ण आढळला आहे.
पुणे जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबळींची संख्या आज २० वर पोचली. यापैकी एक रुग्ण बारामतीचा असून पुण्याच्या ससून रुग्णालयात काल रात्री त्याचा मृत्यू झाला. ६० वर्षे वयाच्याया रुग्णाला मधुमेह आणि पक्षाघातही झाला होता, त्याच्या कुटुंबातल्या चारजणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचं चाचणीत स्पष्ट झालं आहे. काल रात्री उशीरा आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.
नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथल्या कोरोना बाधित रुग्णाचा काल मृत्यू झाला आहे. त्याचा अहवाल काल रात्री प्राप्त झाला असून तो पॉझिटीव्ह असल्याच आढळलं आहे. विशेष म्हणजे आणखी पाच जणांचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्यानं प्रशासन सतर्क झालं आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचं वय 51 वर्ष होत. तर अन्य पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एका महिलेसह तीन पुरुषांचा समावेश आहे.
आज सकाळी प्राप्त अहवालानुसार अकोला जिल्ह्यातल्या पातूर इथल्या सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्वजण वाशीम येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते. आता अकोला जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात ८ जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे या नागरिकाचे वास्तव्य असलेला गुलमोहर पार्क आणि मोमीनपुरा भाग प्रशासनानं पूर्णपणे सील केला आहे. तिथली सर्व दुकान, संपूर्ण परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला असून त्यासाठी 500 होमगार्डची मदत देण्यात आली आहे. तसंच या भागात आरोग्य विभागाच्या 50 पथकं मार्फत प्रत्येक घराची तपासणी सुरू केली आहे.
नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेला लागुन असलेल्या मध्यप्रदेशातल्या सेंधवा मध्ये कोरोनाचे १२ रुग्ण आढळल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून मध्यप्रदेशच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.
Credit – AIR