सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी अखेर मौन सोडलं
मुंबई दि. ४: सुशांत सिंग राजपूत च्या आत्महत्येच्या तपासला एव्हाना सुरवात झाली असून दोनच दिवसांपूर्वी बिहार पोलिसांच पथकही महाराष्ट्रात दाखल झालं. सध्या तपासासोबत मोठं राजकारण पेटंलेलं पाहायला मिळतंय. विरोधकांनी विशेषतः भाजपने या प्रकरणी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर दबाव टाकल्याचे आरोप केले आहेत. या बाबत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून ‘सीबीआय’ कडे द्यावा अशीही मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
या सबंध विषयावर आज अखेर आदित्य ठाकरे यांनी मौन सोडलं असून एक निवेदन देत त्यांनी आपली बाजू सर्वांसमोर मांडली आहे. आपल्या निवेदनात ते म्हणाले की, “कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुदा, महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खूपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी व्यक्तिशः माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेले राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलीवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. हा उद्योग व या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत हा काही गुन्हा नाही.”
पुढे आदित्य म्हणाले की, “सुशांत सिंग राजपूत चा मृत्यू दुर्दैवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत व महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक या प्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील या प्रश्नी मी आजही संयमाने स्वागत आहे. अशाप्रकारे चिखलफेक करून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कोणी राहू नये. तूर्त इतकेच !”
हे तर गलिच्छ राजकारण pic.twitter.com/SvvBtU6qHC
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 4, 2020