ते १६ आमदार अपात्र होणार का?; सर्वोच्च न्यायालयात उद्याही होणार युक्तिवाद
नवी दिल्ली, दि. १५: राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोर चालू असलेल्या सुनावणीचा निकाल काय लागणार, याची देशाबरोबरच महाराष्ट्रालाही प्रतीक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद सुरू आहे. आज न्यायालयात बहुमत चाचणीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर शिंदे गटाने बोट ठेवले आहे. शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांचा ही युक्तिवाद आज झाला. उद्या पुन्हा वकिलांचा युक्तिवाद होणार आहे.
ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल आपल्या युक्तिवादात म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी फ्लोअर टेस्टला सामोरे जावे लागले असते तर काही प्रश्न निर्माण होऊ शकले असते. मात्र आता त्यांचा राजीनामा अवैध ठरला तर या चर्चा सार्थ ठरणार आहेत.” ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला काही अर्थ नाही, असा युक्तिवाद केला आहे. त्यामुळे अपात्रतेच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी कमी वेळ होता. आम्हाला सात दिवस मिळाले आहेत. आमदारांच्या घरावरील हल्ल्याबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आमची नाराजी पक्ष नेतृत्वावर आहे. त्यामुळे पक्षांतर हा पक्षांतर्गत नाराजीवर आधारित मुद्दा आहे, असे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल म्हणाले.
