भारतीय बंदरांची क्षमता वाढवण्यासाठी आणि बंदरांमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी १,००,००० ते १,२५,००० कोटी रुपये गुंतवणुकीची मेरीटाइम इंडिया व्हिजन (MIV) २०३० ची योजना
मुंबई, दि. ७: भारतीय बंदरांमधून २०२० या वर्षात कंटेनरयुक्त जहाजांद्वारे १७ दशलक्ष टीईयू माल वाहतूक (थ्रूपुट) झाली. याच कालावधीत चीनमधील बंदरांनी कंटेनरयुक्त जहाजांद्वारे २४५ दशलक्ष टीईयू मालवाहतूक केली. २०२० या वर्षात जगातील २० प्रमुख बंदरांचे एकत्रित कंटेनर थ्रूपुट ३५७ दशलक्ष टीईयू इतके होते.
सध्या भारतामध्ये प्रचंड मोठ्या कंटेनर जहाजांची हाताळणी करण्यासाठी जमिनीलगतची मोठी बंदरे आणि टर्मिनल पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. बंदरांमध्ये उंच ड्राफ्ट (फलाट), अनेक मोठ्या क्रेन, उत्तम यार्ड व्यवस्थापन क्षमता, वाढीव ऑटोमेशन, मोठ्या साठवणी सुविधा, अधिक जमिनीवरील संपर्क सक्षमता (कनेक्टिविटी) आणि कामगारांची वाढीव उत्पादन क्षमता, या सुविधा आवश्यक आहेत. अती मोठ्या कंटेनर जहाजांवरून आणलेला मोठ्या प्रमाणातील माल जलद गतीने उतरवला जाणे आवश्यक असते.
भारतामध्ये जागतिक दर्जाची बंदरे विकसित करण्यासाठी, मेरीटाइम इंडिया व्हिजन (MIV) २०३० ने जागतिक दर्जाची मेगा पोर्ट (मोठी बंदरे) विकसित करणे, ट्रान्सशिपमेंट हब आणि बंदरांवरील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण यासारखे उपक्रम हाती घेतले आहेत. भारतीय बंदरांची क्षमता वाढवण्यासाठी आणि या ठिकाणी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी अंदाजे १,००,०००-१,२५,००० कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे.
विझिंजम (केरळ) आणि वाढवण (महाराष्ट्र) इथे उभारल्या जात असलेल्या बंदरांमध्ये १८ मीटरपेक्षा जास्त खोलीचे नैसर्गिक ड्राफ्ट आहेत. त्यामुळे या बंदरात अती मोठे कंटेनर आणि मालवाहू जहाजे प्रवेश करू शकतील. ज्यायोगे या बंदरांमधील कंटेनर आणि मालवाहू जहाजांची वाहतूक वाढेल आणि भारताला जगाचा कारखाना बनवण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
फोटो प्रतीनिधीक आहे
