सामाजिक कार्यकर्ते प्रमोद ठाकूर आणि ॲड. निशांत घरत यांना जिवे मारण्याच्या धमक्या
मनीषा जाधव यांच्याविरोधातील केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर
उरण, दि. ३(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील जेएनपीटीच्या कर्मचारी मनीषा जाधव यांनी खोटे जातीचे दाखले सादर करून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) मध्ये नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केली आहे. मागील बर्याचा काळापासून या संदर्भात अनेक तक्रारी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद ठाकूर, माजी सरपंच ॲड. निशांत घरत, काशिनाथ गायकवाड, मनीष कातकरी आणि भरत वामन ठाकूर यांनी जेएनपीटी प्रशासन, केंद्रीय दक्षता विभाग, केंद्रीय नौकानयन मंत्रालय, जिल्हा जात पडताळणी समिती, पुणे या कार्यालयात केलेल्या आहेत. या तक्रारी आणि त्या सोबत जोडलेले ठोस पुरावे लक्षात घेवून मनीषा जाधव यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होणार हे निश्चित झाले असल्याने तक्रारदारांना घाबरविण्यासाठी जीवे मारण्याच्या धमक्या व इतर मार्गांनी दबाव टाकण्याचे प्रकार घडत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनीषा जाधव यांनी दिलेल्या लेखी खुलास्यामध्येच त्यांचे जातीचे दाखले खोटे आहेत हे स्पष्ट होत असल्याने ते सिध्द करण्यासाठी इतर कोणत्याही पुराव्याची गरजच नाही. त्यामुळे मनीषा जाधव यांच्यावर कारवाई होणार हे स्पष्ट झाल्याने तक्रारदारांवर सर्व स्तरातून, साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दि. ३१ मे २०२२ रोजी ॲड. निशांत घरत हे एकटेच राहत्या घरी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने मनीषा जाधव यांच्या विरोधातली तक्रार मागे न घेतल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. तर सामाजिक कार्यकर्ते प्रमोद ठाकूर यांना देखील तक्रार मागे न घेतल्यास ऍट्रासिटीखाली खोटे गुन्हे दाखल करू अशा धमक्या देणारे कॉल लँडलाईन वरून अज्ञात लोकांकडून येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून दिनांक ३१/०५/२०२२ रोजी प्रमोद ठाकूर आणि निशांत घरत यांनी या गंभीर प्रकाराची रीतसर तक्रार न्हावा शेवां पोलीस स्टेशन आणि पोलीस आयुक्त नवी मुंबई यांना लेखी स्वरूपात केली आहे. या पुढे या प्रकरणामध्ये कोणत्याही व्यक्तीने चुकीचे काही करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कोणीही कसलेही निरोप किंवा धमक्यांचे मेसेज पाठवू नये. आम्ही त्याला भीक घालत नाही. मनीषा जाधव यांना त्यांच्या जातीच्या दाखल्यावर आत्मविश्वास असेल तर त्यांनी आमच्यावर अट्रोसिटी चा गुन्हा नोंदवूनच दाखवावा. उगाच दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन असले उद्योग करू नयेत. असे सडेतोड मत प्रमोद ठाकूर यांनी व्यक्त केले आहेत.
