“देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने रुळावर येत आहे” – पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त गतीने परत रुळावर येत असून बाजारपेठा आणि बाजार शक्तींना नवा भारत मानतो, याचे स्पष्ट संकेत अलिकडच्या सुधारणांनी जगाला दिले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
कामगार क्षेत्रात सरकारने नुकत्याच केलेल्या सुधारणांमुळे कारखानदारी आणि शेती, या दोन्ही क्षेत्राच्या वाढीला चालना मिळेल, तसंच परतावा वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं.
कारखानदारीच्या क्षेत्रात भारताला आघाडीचा देश बनवण्यासाठी सरकारनं मजबूत पाया रचला आहे. त्यामुळे गेल्यावर्षी अमेरिकेतून भारतात १५४ हरितक्षेत्र प्रकल्प आले आहेत. त्या तुलनेत चीनमधे ८६, व्हिएतनाममधे १२, तर मलेशियात १५ प्रकल्प आले.
भारताबाबत जागतिक विश्वास सातत्यानं वाढत असल्याचं हे निदर्शक आहे, असं मोदी म्हणाले. कार्पोरेट करातली कपात, कोळसा क्षेत्रात व्यावसायिक खनिकर्माचा प्रारंभ, अंतराळ क्षेत्र खाजगी गुंतवणूकीसाठी खुलं करणं, नागरी विमान वाहतुकीसाठीच्या हवाई मार्गांवरचे लष्करी निर्बंध उठवणं इत्यादी उपाय योजनांमुळे आर्थिक वाढीला चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रावर भर दिल्यामुळे आर्थिक व्यवस्था पुनरुज्जीवित होईल आणि वाढीला लागेल. त्यासाठी सरकार सर्वतोपरी उपाययोजना करेल, असं त्यांनी सांगितलं. सन २०२४ पर्यंत पाच लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचं उद्दिष्ट कोविडचं संकट असूनही गाठता येईल, याबाबत आपण अजूनही आशावादी असल्याचं मोदी म्हणाले.
कोरोनावर लस आल्यानंतर देशातल्या प्रत्येक नागरिकाला ती दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. एकही भारतीय यापासून वंचित राहणार नाही, असं ते म्हणाले. या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वेळेवर निर्णय घेऊन अंमलबजावणी केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे. टाळेबंदी लागू करण्याची आणि टाळेबंदी उठवण्याची वेळही योग्यच होती, असंही ते म्हणाले.
