विस्थापितांचि शासनाकडे मूळ शेवा कोळीवाडा गावठाणात नागरी सुविधा पुरविण्याची मागणी
उरण, दि. १४ (विठ्ठल ममताबादे): शेवा कोळीवाडा गावातील ग्रामस्थांचे कोणत्याच प्रकारे योग्यरित्या शासनाने पुनवर्सन न केल्याने शेवा कोळीवाडा ग्रामस्थांनी शासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांच्या कोणत्याच मागण्या पूर्ण न झाल्याने दि. ८ जानेवारी २०२३ पासून सर्व ग्रामस्थ, २५६ कुटुंबांनी जूना शेवा कोळीवाडा गावात साफसफाई करून गावातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. ८ जानेवारी पासून शेवा कोळीवाडा गावातच राहून शासनाचा निषेध ग्रामस्थांनी नोंदविला आहे. आता आम्हाला पुनवर्सन नको तर आम्हाला आमची जमीन परत द्या व सर्व नागरी सेवा सुविधा दया अशी मागणी शेवा कोळीवाडा गावातील सर्वच ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. जे.एन.पी.टी. ने शेवा कोळीवाडा या गावातील ग्रामस्थांचे पुनवर्सन हनुमान कोळीवाडा व नविन शेवा या ठिकाणी केले. परंतु त्या ठिकाणी कोणत्याही मूलभूत सुविधा पुरविल्या नाहीत. योग्य ते पुनवर्सन केलेले नाही. ३८ वर्षे होऊन सुद्धा प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता आम्हाला पुनर्वसन नको. आम्हाला आमच्या शेवा कोळीवाडा गावातच राहायचे आहे. त्यासाठी तातडीने रस्ते, गटारे, लाईट, पाणी आदी नागरी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पुनर्वसन अधिकारी अलिबाग यांनी दि. ११/०२/२०२१ रोजी जेएनपीटी कडून ५ कोटी ६९ लाख रुपये शेवा कोळीवाडा गावातील २५६ शेतकरी व बिगर शेतकरी कुटूंबांचे शासनाचे माप दंडानुसार मंजूर पुनर्वसन करण्यासाठी घेतले आहेत त्या रक्कमेततून शेवा कोळीवाडा गावाचा जुना रस्ता दुरुस्त करून द्या, गावठाण सपाट करुन द्या, रस्ते, गटार, लाईट, पाणी, शौचालय वगैरे आदी नागरी सुविधा दया अशी मागणी सर्वांनीच तहसीलदार व पोलीस अधिकारी यांच्याकडे केली आहे. आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी उरण तालुका लोकशाही दिनात १६ जानेवारी २०२३ रोजी हनुमान कोळीवाडा गावातील ५०० ते ६०० ग्रामस्थ उरण तहसील कार्यालयाला घेराव घालणार आहेत.
