“मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना पक्षप्रमुख पदही सोडायला तयार” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. २२ : बंडवीर एकनाथ शिंदे यांच्या डावपेचांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेला एक रणनीती आखणे गरजेचे होते. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. “ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही” असं ते म्हणाले.
राज्यात सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून भाष्य केले. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन देखील केले. मुख्यमंत्रीपदी आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी नको असेन, तर बंडखोर आमदारांनी आणि शिवसैनिकांनी समोर येऊन सांगावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
माझ्यावर अविश्वास असेल, तर समोर येऊन सांगा. मी तात्काळ राजीनामा देईन, अविश्वास ठरावाची वेळ येऊ देऊ नका, असंही ते म्हणाले. तसेच, मी आजच वर्षा या शासकीय निवासस्थानावरचा मुक्काम मातोश्रीवर हलवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्याची शिवसेना बाळासाहेबांची नाही, मग बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर २०१४ साली एकट्याच्या जीवावर निवडून आलेले ६४ आमदार कुठले होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हिंदुत्त्व हा शिवसेनेचा श्वास आहे. शिवसेना हिंदुत्त्वापासून कधीच दूर जाऊ शकत नाही, असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रशासनाचा कसलाही अनुभव नसताना मला मुख्यमंत्रीपदाची गळ घातली. अन्यथा मी मुख्यमंत्री झालो नसतो. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, पण माझ्याच लोकांचा माझ्यावर विश्वास नसेल तर पदावर राहणं योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं. शस्त्रक्रियेमुळे मी गेल्या काही महिन्यात कोणालाही भेटलो नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.