किरेन रिजीजू यांना केंद्रीय कायदा मंत्री पदावरून हटवले; संजय राऊत म्हणाले….
मुंबई, दि. १८: केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झाले आहेत. सरकारने किरेन रिजीजू यांना आज कायदा मंत्री पदावरून हटवले आणि त्यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना (UBT) नेते खा. संजय राऊत यांनी रिजिजू यांची कायदा मंत्रालयातून उचलबांगडी केल्याचा खरपूस समाचार घेतला आहे. किरेन रिजिजू यांच्याप्रती न्यायव्यवस्थेच्या नाराजीची केंद्र सरकारने दखल घेतली असून त्यामुळे त्यांचे मंत्रिपद बदलण्यात आल्याचे संजय राऊत म्हणाले. हा न्यायव्यवस्थेचा विजय असल्याचे ते म्हणाले.
७ जुलै २०२१ रोजी रिजिजू यांना कायदा मंत्री बनवण्यात आले. कायदा मंत्री या नात्याने, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्याच्या कॉलेजियम पद्धतीवर टीका करण्यात रिजिजू हे सरकारमधील सर्वात अग्रणी होते. काही निवृत्त न्यायमूर्ती भारतविरोधी टोळीचा भाग असल्याच्या त्यांच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना तीव्र टीकेला सामोरे जावे लागले होते. काही सेवानिवृत्त न्यायाधीश आणि भारतविरोधी टोळीचा भाग असलेले काही कार्यकर्ते भारतीय न्यायव्यवस्थेने विरोधी पक्षाची भूमिका बजावावी असा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.
या फेरबदलावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी दावा केला की नरेंद्र मोदी सरकारमधील कोणीही कायदा विभाग स्वतंत्रपणे हाताळण्यास सक्षम नाही, त्यांनी आरोप केला की रिजिजू यांनी न्यायव्यवस्थेच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आणि भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि इतर अनेकांचा अपमान केला. संपूर्ण न्यायव्यवस्था मंत्री आणि सरकारच्या विरोधात होती, त्यामुळे सरकारला हे पाऊल उचलावे लागले. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा विजय असल्याचा दावा राऊत यांनी केला.
