आगामी २४ तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता
मुंबई/पुणे, दि. २४: राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून कालपासून रिमझिम पडणाऱ्या पावसाने आज चांगलाच जोर धरला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी सह पुण्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, रत्नागिरी, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांसह कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, धुळे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरीत महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
