नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सरकार पायाभूत सुविधांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे आणि येत्या दोन वर्षांत १५ लाख कोटी रुपयांच्या रस्ते बांधणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय चालू आर्थिक वर्षात महामार्ग बांधणीत दररोज ४० किलोमीटरचे लक्ष्य साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की सरकार रस्ते क्षेत्रात बांधणी १००% थेट परदेशी गुंतवणूकीला परवानगी देत आहे.
ते म्हणाले की, भारतात वर्ष २०१९-२०२५ कालावधीसाठी राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन (एनआयपी)सारखे प्रकल्प पहिल्यांदाच सुरू झाले असून, नागरिकांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. ते म्हणाले की एनआयपी अंतर्गत २०२५ पर्यंत १११ लाख कोटी रुपये खर्चून एकूण ७,३०० हून अधिक प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. ते म्हणाले की एनआयपीचा उद्देश प्रकल्प तयारी सुधारणे आणि महामार्ग, रेल्वे, बंदरे, विमानतळ, मोबिलिटी , ऊर्जा आणि कृषी आणि ग्रामीण उद्योग अशा पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक आकर्षित करणे हा आहे.
भारत-अमेरिका भागीदारी दृष्टीकोन शिखर परिषदेला काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना ते म्हणाले की द्विपक्षीय संबंधांच्या नवीन युगात भारत आणि अमेरिकेचे राष्ट्रीय हितसंबंध एकत्रित होत आहेत आणि दोन्ही देशांच्या प्रशासनात आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे सर्व प्रलंबित व्यापार समस्या दूर होतील आणि प्रमुख व्यापार करारावर लवकरच स्वाक्षऱ्या करण्यात येतील. त्यांनी अमेरिकन कंपन्यांना भारतात पायाभूत सुविधा आणि एमएसएमई क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले.
