केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यांच्या हस्ते मुंबईतील आर. डी अँड एस. एच नॅशनल कॉलेज व एस डब्ल्यू ए विज्ञान महाविद्यालय येथे सेंद्रिय उद्यानाचे उद्घाटन
मुंबई, दि. १७ : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज मुंबईतील आर. डी अँड एस. एच नॅशनल महाविद्यालय आणि एस डब्ल्यू ए विज्ञान महाविद्यालय येथे सेंद्रिय उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. पर्यावरण शाश्वततेसंबधी ‘एन्व्हायरॉन्मेंट सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज बाय आर. डी. नॅशनल कॉलेज’ या पुस्तकाचे प्रकाशनही आर. डी. अँड एस. एच. नॅशनल कॉलेज व एस डब्ल्यू ए सायन्स कॉलेज तर्फे करण्यात आले. आज उद्घाटन झालेल्या सेंद्रिय उद्यानाव्यतिरिक्त, या महाविद्यालयामध्ये वॉटर रिसायकलिंग प्लांट, एक औषधी उद्यान, सौर पॅनेल देखील आहेत.
”कचरा किंवा वाया जाणारे काहीच नसते, आणि सुयोग्य तंत्रज्ञानाचा वापर करून आपण कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर करू शकतो, असे सांगून गडकरी यांनी देशातील पर्यावरणपूरक, पुनर्वापराच्या उपक्रमांची माहिती दिली. “गेल्या ८ वर्षांपासून, आम्ही नागपूरच्या सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करत आहोत आणि ते वीज निर्मितीसाठी महाराष्ट्र सरकारला विकत आहोत. दरवर्षी रॉयल्टी म्हणून आम्ही ३०० कोटी रुपये कमावत आहोत. त्यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा येथेही हाती घेण्यात आलेल्या अशाच प्रकारच्या प्रकल्पांची माहिती दिली.

हरित इंधनाच्या महत्त्वाचा पुनरुच्चार गडकरी यांनी केला. रस्ते वाहतूक मंत्रालय सन २००० पासून ऊर्जा क्षेत्रात शेतीचे वैविध्यीकरण करून ऊर्जा क्षेत्रासाठी वापराबाबत काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. “आम्ही उसापासून इथेनॉलसारखे हरित इंधन निर्मिती करत आहोत जे किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी असून त्यामुळे इंधनाची आयात कमी करण्यास मदत होते,”असे त्यांनी सांगितले. “नैतिकता, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण हे आपल्या समाजाचे तीन महत्त्वाचे स्तंभ आहेत. ”
रस्ते वाहतूक मंत्र्यांनी दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या स्थितीची माहिती दिली. दिल्ली ते जेएनपीटी या पहिल्या टप्प्याचे काम याच वर्षी पूर्ण होईल, असे ते म्हणाले. “नरीमन पॉईंटला दिल्लीशी जोडून हा प्रवास १२ तासांचा करण्याची आपली योजना आहे”, असे त्यांनी सांगितले.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या कामगिरीविषयी गडकरी यांनी सांगितले. “देशातील सुमारे एक कोटी लोक सायकल-रिक्षा चालवतात हे जाणून मला दुःख झाले. त्यांच्यापैकी ८० लाख लोक आज ई-रिक्षा चालवत आहेत. “देशातील ४०० स्टार्ट-अप इलेक्ट्रिक स्कूटर, ई-रिक्षा इत्यादी बनवत आहेत.”
या कार्यक्रमाला हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट विश्वस्त मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
