“रणनीती म्हणून व्यत्यय आणि अडथळ्यांचा शस्त्रास्त्र म्हणून वापर करण्याचे जनता कधीच समर्थन करणार नाही” – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, दि. १८: उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आज ७५ वर्षांच्या संसदीय प्रवासाचे महत्त्व सांगितले आणि भारतीय लोकशाहीला आकार देणारी कामगिरी, अनुभव, आठवणी आणि शिकवण अधोरेखित केली. संसदीय लोकशाहीवरील “जनतेचा अढळ आणि अतूट विश्वास” अधोरेखित करताना, उपराष्ट्रपती म्हणाले,” आपल्या लोकशाहीचे यश हे “आम्ही भारताचे लोक” चा सामूहिक, एकत्रित प्रयत्न आहे.“
आज राज्यसभेच्या २६१ व्या अधिवेशनाच्या सुरुवातीला केलेल्या भाषणात धनखड यांनी नमूद केले की, १५ ऑगस्ट १९४७ रोजी नियतीबरोबर केलेला वायदा (‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी) पासून ते ३० जून, २०१७ ला जीएसटी प्रणालीच्या अंमलबजावणीपासून ते आतापर्यंत राज्यसभेच्या पवित्र परिसराने अनेक ऐतिहासिक क्षण पाहिले आहेत.
तीन वर्षांतील संविधान सभेच्या चर्चेदरम्यान साक्षीदार असलेली सभ्यता आणि निकोप चर्चा यांचे स्मरण करून, सभापती म्हणाले की, वादग्रस्त आणि मोठी दरी निर्माण करणाऱ्या मुद्द्यांवर सहमतीच्या भावनेने वाटाघाटी करण्यात आल्या.
निकोप चर्चा ही बहरलेल्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे असे सांगत, धनखड यांनी संघर्षात्मक पवित्रा तसेच व्यत्यय आणि अडथळा आणण्याला शस्त्र बनवू नये यासाठी खबरदारी घेण्यास सांगितले. “आपण सर्वजण लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी घटनात्मकदृष्ट्या नियुक्त आहोत आणि त्यामुळे लोकांच्या समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांचा विश्वास सार्थ करणे आवश्यक आहे,” यावर त्यांनी भर दिला.
संसदेतील सदस्यांचे बुद्धिचातुर्य, विनोदबुद्धी आणि उपरोध यांचे महत्त्व अधोरेखित करत, धनखड यांनी याचा उल्लेख “दमदार लोकशाहीचा अविभाज्य पैलू” म्हणून केला आणि अशा हलक्या फुलक्या चर्चा आणि अभ्यासपूर्ण चर्चा पुन्हा घडाव्यात अशी आशा व्यक्त केली.
संसदेच्या परिसरात घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टींवर चिंतन आणि विचार करण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी संसद सदस्यांना केले. ”संसदेचे हे सत्र संविधान सभेपासून सुरू होणारा ७५ वर्षांचा संसदीय प्रवास – कामगिरी, अनुभव, आठवणी आणि बोध “यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची एक योग्य संधी उपलब्ध करून देते, असे ते म्हणाले.
भारताच्या लोकशाही आदर्शांचे जतन करणारे आणि ते समृद्ध करणारे आपले स्वातंत्र्यसैनिक, राज्यघटना निर्माते, राज्यकर्ते, राजकारणी आणि नागरी सेवक यांचे योगदान उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले.
