“नव्या कृषी कायद्यात कंत्राटी शेतीमधून शेतकऱ्यांना कधीही बाहेर पडण्याची परवानगी” – कृषिमंत्री तोमर
नवी दिल्ली: कंत्राटी शेतीमध्ये, व्यापाऱ्यांबरोबर केलेल्या करारातून शेतकऱ्याला कधीही बाहेर पडण्याची अनुमती नव्या कृषी कायद्यात असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी काल राज्यसभेत सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेत्तृत्त्वाखाली केंद्र सरकार गाव, गरीब आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी कटीबद्ध असल्याचं ते म्हणाले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेत ते बोलत होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच्या सर्व तरतुदी या नवीन कायद्यांमधे असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. शेतकऱ्यांबरोबर बैठकीच्या अकरा फेऱ्या झाल्यानंतरही शेतकरी नेत्यांनी त्यांचा आक्षेप असलेल्या मुद्यांवर काहीच सूचना केल्या नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
