राज्यातल्या ११ वी प्रवेशाच्या ऑनलाइन प्रक्रियेला आज पासून प्रारंभ
मुंबई, दि.२३: राज्यातली ११ वी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया आजपासून सुरू झाली. मुंबई महानगर क्षेत्र यासह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती आणि नाशिक महापालिका क्षेत्रातल्या राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी ११thadmission.org.in या वेबसाइटवर अर्ज दाखल करावे लागतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना सरावासाठी अर्ज उपलब्ध भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. आजपासून २७ मे पर्यंत विद्यार्थ्यांना हे अर्ज या वेबसाइटवर भरता येतील. त्यानंतर २८ तारखेला ही सर्व माहिती काढून टाकली जाईल आणि ३० मे पासून अर्जाचा पहिला भाग भरण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होईल.
राज्य शिक्षण मंडळाच्या १० वी च्या परीक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत, अर्जाचा पहिला भाग भरता येईल. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्ज प्रक्रियेच्या दुसऱ्या भागाला सुरुवात होईल. यामध्ये विद्यार्थ्यांना पसंतीची कनिष्ठ महाविद्यालयं निवडून पसंतीक्रम नोंदवता येईल, असंही त्या म्हणाल्या. या केंद्रीय प्रक्रियेद्वारे सर्वसामान्य महाविद्यालयातल्या ८५ टक्के तर अल्पसंख्यांक महाविद्यालयातल्या ३५ टक्के जागांवर प्रवेश दिले जातील. दोन्ही महाविद्यालयांमधल्या १० टक्के जागा संस्थांतर्गत विद्यार्थ्यांसाठी तर ५ टक्के जागात व्यवस्थापन कोट्यासाठी राखीव असतील. अल्पसंख्याक महाविद्यालयातल्या ५० टक्के जागांवर अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेश दिले जातील, असंही राज्य सरकारच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. राज्यातल्या उर्वरित ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
