मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या एका शब्दावर राजीनामा देणाऱ्या खा. अरविंद सावंत यांना मिळाला ‘या’ कारणामुळे मंत्रिपदाचा दर्जा
मुंबई: ३ महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात राजकीय आणिबाणी आली आणि केंद्रातील भाजप प्रणित ‘एनडीए’ मधून शिवसेना बाहेर पडली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका आदेशावर तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी तात्काळ राजीनामा दिला. याचे बक्षिस म्हणून केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या राज्यातील विविध प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यासाठी गठित महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात येत आहे. इतिहासात पहिल्यांदाच असं पद निर्माण करण्यात आलंय. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील रविंद्र वायकर यांच्यासाठीही एक पद निर्माण करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील संसद सदस्यांची बैठक झाली होती. त्यामध्ये केंद्र शासनाकडे प्रलंबित प्रस्तावांबाबत चर्चा झाली होती. या प्रस्तावांचा वेळोवेळी पाठपुरावा करण्यासाठी खासदार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
समितीचे अध्यक्ष खा. अरविंद सावंत यांचे कार्यालय नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे असेल. त्यांना कामकाजासाठी आवश्यक सुविधा तसेच अधिकारी- कर्मचारी नवी दिल्लीतील सचिव तथा निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन यांच्याकडून देण्यात येणार आहेत.
