‘NATA’ परीक्षेत महाराष्ट्र कन्या अनन्या सावंत सावंत देशात अव्वल
यशाच्या शिखराकडे आपल्या मजबुत पंखांनी व आत्मविश्वासाने झेप घेणाऱ्या एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील अनन्या सावंत हीची ही यशोगाथा.
मुंबईच्या कांदिवली पूर्व उपनगरातील सावंत कुटुंबाने अनन्या नावाचा हा कोवळा अंकुर जोपासला आणि तिच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचे बळ तिच्यात रुजवले. आईवडिलांचा विश्वास सार्थ करत ह्या मुलीने जे ठरवले ते साध्य करण्यासाठी अपार कष्ट घेतले. स्वतःची क्षमता ओळखून मनी ठरवले ते लक्ष साधण्यासाठी कष्ट व साधना किती महत्वाची ते तिला शाळेपासूनच अंगवळणी पडले होते. परिश्रम करण्यात तिने कधीही कुचराई केली नाही.
लहानपणापासूनच अनन्या ला प्राचीन इतिहास, पुराणकालीन वास्तुकला, साहित्य व भाषिक सौंदर्य, कला ह्या विषयात रस होता. शालेय शिक्षणात गणित व विज्ञान ह्या सारखे विषय ही आवडू लागले. ज्यामुळे तिने दहावी नंतर वास्तुविशारद(Architect) होण्याचे ठरवले. अनेक वास्तुविशारदांचे काम पाहणे कदाचित इंटरनेट मुळे शक्य झाले. इच्छा व जिद्द निर्माण झाली. अनन्या Antony Gaudi यांच्या कामाने फारच प्रभावित झाली. त्यांच्या सारखेच सुंदर नयनरम्य सुबक पण तरीही परिपूर्ण कलाकृती तयार करण्याचे तिचे स्वप्न आहे.
एखादी गोष्ट ठरवली की ती हासिल करायचीच हा तिचा स्वभावधर्म. मग काय अविरत मेहनत व त्याच्या जोडीने गुरू व शिक्षक Ar. Raylynne D’sa ह्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षांच्या अथक परिश्रमाने तिने महामारीच्या कठिण काळातही विचलित न होता आपले ध्येय साध्य केले आहे. अजिबात विचलित न होता अभ्यासाबरोबरच वाचन, रोजच चित्रकलेचा सराव आणि सामान्य ज्ञान ह्याचा पाठपुरावा करून तिने आपले प्रथम लक्ष्य साध्य केले आहे.
तिला NATA 2020 च्या प्रवेश परीक्षेत (भावी वास्तुकला विशारद होण्यासाठी ची entrance exam) 200 पैकी 189.5 इतके अत्युच्च गुण मिळाले. ह्या गुणांनी तिला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अखिल भारतीय स्तरावर सुद्धा प्रथम क्रमांक (AIR 1, B.Arch Merit list) मिळवून दिला, आईवडिलांचा व शिक्षकांचा विश्वास सार्थ केला.
अनन्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की स्वतःला ओळखा, तुमची बलस्थाने आणि उणिवा जाणून घ्या आणि कुठल्याही गोष्टीचा ताण न घेता मेहनत करावी. अर्जूनाप्रमाणे एकलक्षी बनून आपले ध्येय साध्य करा. अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करून काळजी न करत स्वतःवर भरवसा ठेवून कष्ट करण्याची तयारी ठेवा. “केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे”.
दृढनिश्चय व त्यासाठी केलेली अखंड तपश्चर्या फळास आली आणि यशाची पहिली पायरी यशस्वी रित्या सर केली.