जिल्ह्यांनी आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदवावी; अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश
कोविड-१९ च्या रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे ऑक्सीजन पुरवठा करतांना आवश्यक असणारी यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित राहावी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ.शिंगणे यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले, राज्यातील ११ टक्के रुग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता पडते आहे. याचं प्रमाण सुमारे ५०० मेट्रिक टन एवढे आहे तर सध्या एक हजार पेक्षा जास्त ऑक्सीजनचे उत्पादन होत आहे. तरीही काही ठिकाणी ऑक्सीजन मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सर्व पुरवठादार आणि वाहतुकदार यांनी आपले वितरणाचे जाळे वाढवून योग्य सहकार्य करुन गरजूंपर्यंत ऑक्सीजन पोहोचेल याची खबरदारी घ्यावी. या कामात काही अडचण असल्यास शासनातर्फे अडचण दूर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
ऑक्सीजन पुरवठ्यासह मास्कच्या किंमती, सॅनिटायझरची उपलब्धता, रेमडेसिविर आणि इतर औषधे तसेच खासगी डॉक्टरांकडे उपलब्ध असलेला ऑक्सीजनचा साठा याचाही डॉ.शिंगणे यांनी सविस्तर आढावा घेतला.
विशेष नियंत्रण कक्ष
कोविड-१९ चा प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांसाठी अन्न व औषध पुरवठा विभागाने विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. राज्यात कोणत्याही जिल्ह्यात ऑक्सीजनची आवश्यकता असल्यास त्या जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकीत्सक हे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत आपली मागणी नोंदवितात. जवळच्या पुरवठादाराकडून ऑक्सीजन तातडीने त्या जिल्ह्याला उपलब्ध करुन दिले जाते. या कंट्रोल रुम मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागासह आरोग्य विभाग आणि उद्योग विभागाचे संबधित अधिकारी समन्वय साधत असतात. यासाठी टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ तसेच ०२२-२६५९२३६४ हा दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित आहे.
