हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून ५५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या पटलावर सादर
नागपूर, दि. ७: राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली.पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ५५ हजार कोटींहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या मांडल्या.यात जलजीवन मिशनसाठी सर्वाधिक ४ हजार २८३ कोटी रुपयांची मागणी आहे. याशिवाय MSME, नागरी भागातले रस्ते, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका शाळेतल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन,प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा हप्ता, नमो शेतकरी महासन्मान निधी, मोदी आवास घरकुल योजना, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सवलतीची प्रतिपूर्ती यासाठी विविध तरतुदी प्रस्तावित आहेत. त्यापूर्वी सरकारनं आज ३ अध्यादेश पटलावर सादर केले. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत संमती मिळालेल्या विधेयकांना राज्यपालांनी मान्यता दिल्याचं सभागृहात जाहीर करण्यात आलं. या अधिवेशनासाठी अध्यक्षांनी संजय शिरसाट, समीर कुणावार, यशोमती ठाकूर आणि चेतन तुपे यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली.
